March 07, 2012

इ-मराठीला महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय

इ-मराठीला महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय 
मराठी भाषा दिन २७ फेब्रूवारी २०१२ रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मुंबईत साजरा करण्यात आला. स्थळ : पु ल देशपांडे कला अकादमी । 

मराठी भाषा दिन २०१२ सरकारी जाहिरात 
मराठी भाषा कित्येक शतके लोकाश्रयावर वाढली. अजूनही वाढतेय. राजे-नबाब यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे कलावंताना राजाश्रय दिला. उदाहरणादाखल, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहूमहाराज यांनी बदलत्या काळानुसार शिक्षण, पर्यायाने भाषा व साहित्य, लोकांपर्यत पोचवले. या विभूति खरोखरी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. 
    शिक्षणाला  मौखिक असो की लिखापट्टीचे  भाषेचे व प्रत्यक्ष कृतीचे, दोन्ही माध्यमे हवी. केवळ एकाने शिक्षण अपुरे रहाते. शब्दकोशातील लाखो शब्दांना काहीच अर्थ नसतो. तसेच शिक्षण जर जीविकेचे साधन झाले नाही तर तेही शब्दकोशाप्रमाणे निरर्थकच! जशा हल्लीच्या घोषणा व जाहिरातबाजी! 
    मराठी भाषादिनाला पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात सरकारी 'मराठी विभाग' व National Book Trust यांचा सहभाग होता. याचे काम फार मोलाचे आहे. मात्र येथे भेट देणारे लोक विरळाच. इंग्रजी पेपरातली जाहिरात पाहून मी फक्त दुसर्‌या दिवशी प्रदर्शन पाहायला दाखल झालो : नवीन काय आहे बघायला. 
    इ-मराठी विश्वकोश हेच ते नाविन्य! विश्वकोशाचे आठ खंड आता फ्लॉपीवर उपलब्ध केलेत. कालमानाने यापुढे नवीन संशोधनाने येणारी माहितीपण याच्यात वेळोवेळी भर घालील अशी आशा करुं! इतर साहित्याची भर इ-पुस्तकांत आणायची सरकारी योजना आहे. 
    राज्य मराठी विकास संस्थेने संगणकावर वापरण्यासाठी युनिकोड-आधारित मराठी टंक (फॉण्ट) यावेळी सूचित केला. 'संस्कृत 2003' हा खालील संकेतस्थळावर विनामूल्य मिळतो. 
http://www.omkarananda-ashram.org/Sanskrit/itranslator2003.htm  इतरही मराठी टंक आहेत. माझी शुद्धलेखनाची अडचण लक्षांत घेता, मला वाटते, मराठी शुद्ध लेखन व व्याकरण संगणकावर मला या जन्मी मिळणार नाही.
  
आता इ-जमाना आलाय. जुन्या-नव्या उपयुक्त दर्जेदार मराठी साहित्याची व संशोधनाची भर आता विश्वजालावर टिचकी मारताच मिळेल आशा मनात उगवली! दैनंदिन आयुष्यातील गरजेचे कितीतरी विषय एकामागून एक मनात येतात, जातात...! हेपण मराठीत संगणकावर मिळतील का?
    राजाश्रय आला की मला हमखास तुकाराम आठवतो. शिवाजीमहाराजांनी तुकारामाला पाठवलेली किमती भेट, आणि त्याने ती नाकारून परत केली ते आठवते. 
    दुसराही एक हल्लीचाच प्रसंग आठवतो. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला मोटारीने (वारीला) गेला होता. बरोबर लालबत्ती आणि सायरनच्या मोटारी, नोकरशहा, चमचे इ. लवाजमापण आलाच की! 
    आठी दिशांनी गात-नाचत वारकरी येत होते. पण मुख्यमंत्रीसाहेब राजेशाही मोटारीतून उतरायला तयार नाही. शेवटी सर्व वारकर्‌यानी पंढरीच्या वाटेवरच बसकण मारली. तेव्हाकुठे साहेबाने आपले पाय जमिनीला लावले. मराठी संत शतकानुशतके जे लोकशिक्षणाचे काम करीत आले त्याला इतिहासात तोड नाही. (या संतांचा उल्लेख आम्ही "भूतकाळात" करीत नाही. तुकारामाची गाथा काळाच्या महानदात तरंगली!)    

भाषा संचनालय वेळेवेळी अनेक पुस्तके वाजवी किंमतीत प्रसिद्ध करते. पण त्याच्या किती प्रती छापल्या जातात, किती खप होतो म्हणजे किती लोक लाभ घेतात, पुनर्मुद्रण इत्यादि माहिती मला नाही. एक माहित आहे : पुस्तकाचा खप जेवढा अधिक तेवढे ते अधिक स्वस्त, तेवढी त्या उपलब्धीने वाचनाची आवडही वाढते.
    महाराष्ट्रात खेडोपाडी व लहानमोठ्या शहरांत मराठी माध्यमाच्या हजारो शाळा-कॉलेजात यातील किती पुस्तके जात असतील? मला शंका आहे. 
    यांतील अनेक संस्थांना सरकारी अनुदानपण मिळत असेल. त्यांच्या श्रेणीनुसार योग्य पुस्तके "अनुदानाचा भाग" म्हणून समावेश करता येईल. शिक्षण आणि भाषा यांच्या अभेद्य नात्यात माझी अशी ग्राम्य व्यापार-नीती बसेल का?  
    'धुळाक्षरे' ते दगडी पाटी पेन्सील, फळा खडू, कागद लेखणी पर्यंत साक्षरता व शिक्षण यांचा प्रवास मनोज्ञ आहे. कोट्यवधी जनता अजूनही या साधनांपासून वंचित आहे. "इ-साक्षरता" तर फार दूरची गोष्ट : साध्या सरळ व्यवहाराचे गणित. पण ही केवळ साधने आहेत, शहाणपणाची ग्यारंटी नव्हेत. 

कोष्टी कबीराची गोष्ट आठवते!
याने तर कधी लेखणी हातात धरली नाही. 

—  रेमीजीयस डिसोजा
मुंबई । होळी पौर्णिमा २०१२
१. संबंधित एक कविता : देणारे कोण? घेणारे कोण?  यात विठ्ठलाला कौल लावलेला आहे!
२. संबंधित शिक्षणावर माझा पहिला स्फुट लेख : INDIAN SCHOOLING  याचे मराठी भाषांतर करायची इच्छा अजून पुरी व्हायची आहे.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:

Post a Comment