September 30, 2010

वळणावळणाने जाणारी वाट माझ्या दारी

वळणावळणाने जाणारी वाट माझ्या दारी   
ओलावतो कातळ काळा मध्यान्ही    
वळून पाहशील तेव्हा  
हरवलेली वाट वळणावर  
अबोलीच्या वळेसरात,  
माडराईत, बांबूच्या बेटात,   
वळणाशी शृंगार वाऱ्याचा फुलेल,   
पायरव हरवेल आभासात.  

(सावंतवाडी - सिंधुदुर्ग.
१६ - ०५ - १९७०)  
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 23, 2010

नारळीचे नागरीकरण: आपला परिसर

नवी मुंबईला गेलो होतो. इथे बरंच काही मुंबई सारखेच आहे. फक्त जुन्या इमारती नाहीत. निवासी संकुलांची बांधकामे जोरात चालू आहेत. दहा - वीस मजली टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. इथे राहायला आलेले घर मालक हौशी आहेत. रस्त्यांच्या कडेला अरुंद फ़ूटपाथवर कुणी अशोकाची कुणी पांगारयाची  झाडे लावलीत. झाडांच्या भोवती कांक्रीटाची फरशी,.माती जवळ जवळ नहीच.   
 

रस्त्याच्या कडेस जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्टीवर नारळी लावल्या आहेत. दोन झाडांमधले अंतर जेमतेम दीड - दोन वाव असेल. सुदैवाने सभोवती माती आहे - फारश्या नाहीत. ही झाडे वाढली कि त्यांची सूर्य प्रकाश मिळावा म्हणून चुरस लागेल. झावळ्या एकमेकांना आलिंगने चुंबने द्यायला लागतील. 
 




वरील दुसरे चित्र कोंकणातील सावंतवाडी येथील संमिश्र शेतीचे आहे.
 
असे सांगतात: ज्या प्रकारच्या नगरात - परिसरात लोक राहतात त्याचा त्यांच्या स्वभावावर परिणाम होतो. जमिनीपासून दूर लहान - मोठ्या चौकोनी खुराड्यात राहणाऱ्या लोकांचा स्वभाव या झाडांच्या लागवडीत (वाटल्यास त्याला उपवन म्हणा) प्रतिबिंबित झालेला दिसतो. लहान - मोठ्या गाळ्यांत राहणारी कुटुंबें उद्या वाढणार - हे सरकारला तसेच वास्तुविदाना, नागरानियोजकाना पण माहित नसते. मग येथे राहणाऱ्या कुटुंबियांना नारळीला किती जागा लागते कसं माहित असणार? ते थोड्या जमिनीला जास्तीत जास्त कसे राबवायचे याचा विचार करतात. माळ्याला तरी माहित असावे! पण तो पडला हौशी हुकुमाचा ताबेदार.  

जागेच्या स्वभावावरून एक आख्यायिका आठवली. बडोद्याला एकदा आम्ही वयोवृध्द प्राध्यापक मुजुमदार यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी या संदर्भात पुढील म्हण सांगितली.

"सुरतनी नार सुंदरी       
खंभातनी नार गोजिरी
वडोदरा नी वांकी नारी
अमदाबादी हरामजादी" 
(टीप: वांकी - चतुर, बडोद्यात बायकांचा हा गुण मात्र मी अनुभवलाय. या कवितेत सांगितलेली वैशिष्ट्ये अर्थातच काही नियम नव्हे.)
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 13, 2010

समकालीन त्रिशंकूचे गाणे

मीपण माझे कुरवाळीत असे मी निरंतर  
माझ्याच कल्पलोकात.   
अठराविश्वे  अन्नान्नगत  दारिद्र्य    
तीस कोटी माणसे मायदेशी भोगत असले तर?     
तर मला काय त्यांचे?   
ते भोगतात त्यांच्या दैवाची फळे!    

मग मी का बरे शोधतोय माझी तोंड-देखली     
जात-जमात आंतरंजालाच्या     
मायावी वास्तवाच्या प्रतिविश्वात     
महागड्या उपग्रहावर संदेश पाठवून?      
माझ्या बलवत्तर दैवाने        
एक पुष्पक विमानच का नाही खरेदी केले?    
"नशीब गांडू तर काय करी पांडू?"     

अरेऽमी असा आसामी!    
यंत्र-मंत्र-तंत्र  विधींच्या आधुनिक विश्वामित्राने    
सुखसमृद्धीचे प्रतिविश्व निर्माण करून   
द्यायची ग्वाही देऊन केला माझा त्रिशंकू!    

आणि हाडामांसाच्या, रक्ताकुडीच्या, जित्याजागत्या 
घरच्याच माणसांना लाविले की रे    
माझ्या हव्यासाने देशोधडीला!    
असा मी उर्मट उद्याम समकालीन त्रिशंकू!   

रेमीजीयस डिसोजा | मुंबई | १०-०८-२०१० 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 04, 2010

नाच माझा आठव्या जन्मीचा

स्त्री व पुरुष सांगाड्यांची रचना 
 हे स्मशानवत भयाण काहीसे  
माझे मन ठेचाळत  
सरपटत या अंधारात  
या कवट्या कवटाळत छातीशी...   
वारा एक वेडाच फुंकर मारतो
या कनातून त्या कानातून  
मग सर्वच कवट्या शीळ घालतात   
त्यांचं विरूप संगीत  
मला पिसाळते  
छातीत धडकते  
पडघम बडवल्यासारखे   
हाडकांच्या टिपरयानी  
आवाज येतात.  

इथं अंधारात कुणाचं थडगं ठेचाळतं!  
माती...   भुसभुशीत जमीन...  मांस सडलेलं  
त्यातून दोर आतड्याचा हाती लागतो  
सात वार लांब  
मी तो तटकन तोडतो  
आत कुठंतरी असह्य कळ येते  
हे तर माझेच आतडे!  
परवाच नाही का दफन झाले! 
ही माळः  
सात जन्मीच्या सात कवट्यांची...    
आणि ही परवाची  
अजूनही सडतेय  
म्हणून हिला दर्प अहंकाराचा!  
इच्यावरचं मांस पुरतं सडून जाईल  
तेव्हा हा दर्पही नाहीसा होईल.  
तेव्हा हिच्यातून सात सूर निघू लागतील.    
 

सात जन्माच्या कवट्या गळ्रयात बांधून   
त्याच्या भेसूर संगीताबरोबर  
मी नाच करतो आठव्या जन्मीचा.  


(काही समाजांत मरणानंतर पुरण्याची प्रथा आहे. तसेच कोण पुनर्जन्म मानतात, कोणी मानीत नाहीत. येथे "मी" हा कवी आहे असे समजायचे कारण नाही. देशी कलाशास्त्रांत नवरस मानले जातात, त्यापैकी एक येथे आहे. कुणी या कवितेला अतिवास्तववादी  (surrrealist ) पण म्हणतील. लिहिताना हा विचार केला नव्हता.)   
-- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape