October 10, 2011

बाप माझा - एक महाकाव्य

बाप माझा - एक महाकाव्य

विस्मरणाच्या धुक्यातून ते क्षण
मावळतीच्या किरणांत
लख्ख चमकले क्षणभर!

तेव्हा माझा बाप चालता बोलता
महायात्रेस निघून गेला होता.
त्याच्या कलेवराच्या चेहरयावर
तेव्हासुघ्धा तृप्तीचे शांत
भाव चिकटून होते.
आणिक अंगावर फक्त
हातभर सूती लंगोट.

सुखी माणसाचा सदरा शोधणारया राजास
माझ्याच बापाने तर फसवले
नव्हते ना?
पण त्याने मला तर
नक्कीच फसवले होते.

शेत बंधाऱ्यावर आड्याओढ़्यांत
मुळ्या काटक्या गवत पाल्यांत
या लंगोटी बहद्दराला गवसले
रहस्य विश्वाचे
ज्याच्यासाठी विश्वामित्राने
घोर तपस्या केली होती म्हणे
आणि संपला होता प्रतिविश्व
निर्माण करण्याच्या महत्वाकांक्षेत.

माझा हेकेखोर
अंविश्वासाने भारलेला बाप
फक्त लन्गोटीच्या एका कमाईवर
राहीला जन्मभर
आणि त्याचे जडीबुटीचे गुपित
उराशी घेऊन मेला.

माझ्या विलायती पदव्या
आणि माझी शल्यविद्या
कशाला कशाला त्याने नाही जुमानले
आपल्या जुनाट बुरसटलेल्या कल्पनांची
आणि अंधश्रद्धेची खातिर करताना.

म्हणे विद्धेचा व्यापार करायचा नाही;
एकादशीला जेवायचे नाही;
'बाहेरच्या' बाईचे वारे घ्यायचे नाही;
सामिष अन्नास स्पर्श नाही;
शेणमातीच्या जमिनीवर बसायचे
आणि बांबूच्या तरटावर झोपायचे।


म्हणायचा, 'तू पोपट सोनेरी पिंजरयातला;
ही विद्या देऊन तुला
मुक्ती नाही मिळणार मला
जन्मोजन्मी'.
सर्वच नन्नाचा पाढा.

आता माझ्या मरणशय्येवर या
पंगू शररिराला जीवदान देणाऱ्या
नालिकानी ढगाळलेल्या
अवकाशात जाणिवेच्या
हा आठवणीचा किरण येतो
कुठूनसा आणि स्पर्श करतो
माझ्या विकलांग मनास.

नदी केव्हाची वाहून गेलीय;
राहिलेत फक्त रेताडाचे पूर
आणिक एक किरण जाणीवेचा।
~~~~~
© remigius de soujaa. al rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. नव आणि जुन यात नेहमी हा तणाव असतो - काय अधिक मूल्यवान याचा! पण नव कधीतरी जुन होत .. आणि जुन नव रूप घेऊन येत. जीवनाच चक्र अव्याहत चालू राहत!

    ReplyDelete
  2. सर्व मानवी कल्पना, संकल्पना - मग त्या देव, धर्म, ज्ञान, विज्ञान, कला, तत्वज्ञान ... असोत - सृष्टीपासून येतात. बासमती तांदूळ, हळद, निंब... यांच्या पेटंट संबंधीचे वाद अनेकांस आठवत असतील. आरोग्याच्या संदर्भांत, औषधि काय परिणाम - दुष्परिणाम करतात हे अनेकांनी अनुभवले असेल: हे झाले एक उदाहरण... देशी ते सर्व टाकाऊ असे समज कोणतीही गोष्ट कसाला लावल्या वाचून ठरवणे शेवटी स्वत:लाच मारक ठरणार. कुंपणातील एरंडाला आता किती भाव आला! कोंकणात एक म्हण आहे: "वशाड्या (ओसाड) गांवांत एरंड बळी" !

    ReplyDelete